लातूर जिल्ह्यातल्या एक लाख ७४ हजार शेतकर्यांपैकी ५८४ जणांची यादी जाहीर झाली. पुढची यादी आज उद्या येईल अशी अपेक्षा असतानाच सरकारने शेतकर्यांची यादी पुन्हा एकदा मागवली आहे. इंटरनेटवर अपलोड करण्याऐवजी ही यादी घेऊन जिल्हा बॅंकेच्या कर्मचार्यालाच मुंबईत बोलावलंय. लातूर जिल्हा बॅंकेचा एक कर्मचारी काल यादी घेऊन मुंबईत दाखल झाला आहे. असेच आदेश राज्यातील सगळ्याच जिल्हा बॅंकांना देण्यात आले आहेत. खात्रीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकर्यांच्या यादीवर काम करणारी एजन्सी बदलण्यात आली आहे. या एजन्सीसाठीच याद्या माणसांकरवी मागवण्यात आल्या आहेत. नेटवर त्या कधी अपलोड व्हाव्यात अन कधी काम सुरु व्हावं असा प्रश्न पडला असेल म्हणूनच हा खटाटोप चालला आहे.
कर्जमाफीसाठी दिलेल्या अर्जात शेतकर्यांनी ६६ रकाने आहेत. त्या सगळ्यांची पडताळणी नव्याने करावी लागेल. त्याला किती काळ लागेल याचा नेम नाही. ही पडताळणी करुन नव्याने याद्या तयार होतील. त्या याद्यातील कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोण अपात्र आहे याची पडताळणी जिल्हा बॅंकांना करायची आहे. त्याला किती काळ लागेल याचाही नेम नाही. शेतकर्यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफी देण्याची घोषणा सरकारने केली होती. त्यात अशी विघ्ने येऊन वेळ जाऊ लागल्यास शिमगा उजाडण्याची वेळ येईल असं वाटतं.
Comments