मुंबई: येणार्या दिवाळीपूर्वी अयोध्येत राम मंदीर बांधून तयार असेल. दिवाळी या मंदिरातच साजरी करता येऊ शकते असा दावा भाजपाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. बाबरी मशीद पाडण्यात आली त्या घटनेला येत्या सहा तारखेला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. मंदीर की मशीद हा वाद अजूनही न्यायालयात आहे. या पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम स्वामी यांच्या या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ‘रामराज्य’ या विषयावरील एका व्याख्यानासाठी ते बोलत होते. येणारी दिवाळी आपण राम मंदिरात साजरी करु शकतो असं स्वामी म्हणतात. राम मंदीर उभं करण्यासाठी सगळं साहित्य तयार आहे. स्वामी नारायण मंदिरासारखे ते जोडले की मंदीर तयार होईल अशी माहिती स्वामी यांनी दिली.
राम मंदीर-बाबरे मशीद प्रकरणी येत्या ०५ डिसेंबरपासून सुनावणी सुरु होणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयात या प्रकरणावर गहन चर्चा झाली आहे त्यामुळे सुन्नी वक्फ बोर्डाकडे खंडन करण्यासाठी काहीच उरलेलं नाही. वादग्रस्त जागेवर पूजा करण्याचा हिंदुंना अधिकार आहे. असा अधिकार मुस्लीमांकडे नाही. त्यांना फक्त मालमत्ता हवी आहे. राम मंदिरासाठी नवा कायदा बनवण्याची गरज नाही. आम्ही नवा कायदा आणू शकतो पण त्याची गरज नाही. हा खटला आम्हीच जिंकू याचा आम्हाला विश्वास आहे असंही स्वामी म्हणतात.
Comments