HOME   लातूर न्यूज

जिल्हा बॅंक बखस्तीची मागणी करणार- संभाजी पाटील

पेरणीपूर्वी पीक विमा देण्यात बॅंकेने घातला खोडा, निलंगेकरांचा आरोप


जिल्हा बॅंक बखस्तीची मागणी करणार- संभाजी पाटील

लातूर: शेतकर्‍यांना लवकरात लवकर पीक विमा मिळावा याकरिता राज्य सरकारने ठोस पावले उचलली होती. लातूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनाही पेरणीपूर्वी पीकविमा मिळण्यासाठी पालकमंत्री या नात्याने सातत्याने पाठपुरावा करून बैठकाही घेतलेल्या होत्या. मात्र, कॉंग्रेसच्या ताब्यात असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्त्ती बँकेने शेतकर्‍यांनी भरलेल्या विमा रकमेची माहिती वेळेत विमा कंपनीला दिलेली नाही, त्यामुळेच शेतकर्‍यांना पेरणीपूर्वी पीकविमा मिळण्यासाठी जिल्हा बँकेने खोडा घातला असल्याचे सांगून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्हा बँक बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.
लातूर येथील विवेकानंद संस्कार केंद्राच्या सभागृहात रेणापूर तालुकाध्यक्ष निवडीसंदर्भात कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, ज्येष्ठ नेते ओमप्रकाश गोडभरले, जि.प. सदस्य सुरेश लहाने, सुरेंद्र गोडभरले, नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, पं. स. सभापती अनिल भिसे आदींची उपस्थिती होती.
शेतकर्‍यांचे कैवारी असल्याचे सांगत शेतकर्‍यांचे हित साधण्यासाठीच जिल्हा बँक काम करीत असल्याचे कॉंग्रेस नेत्यांकडून नेहमीच सांगण्यात येते. मात्र, याच जिल्हा बँकेच्या निष्काळजीपणामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पेरणीपूर्वी पीकविमा मिळण्यात खोडा आला असल्याचे पालकमंत्री निलंगेकरांनी सांगितले. वास्तविक पाहता केंद्र व राज्य सरकारकडून नेहमीच शेतकर्‍यांच्या हिताला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळेच अनुदान, गारपीट अनुदान किंवा पीकविमा तात्काळ शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा व्हावा याकरिता राज्य सरकारकडून नेहमीच ठोस पावले उचलली जातात. सध्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पेरणीपूर्वी पीकविमा न मिळण्यास सरकारच जबाबदार असल्याचे आरोप कॉंग्रेसह इतरांकडून होत आहेत. मात्र, सदर पीकविमा न मिळण्यास सरकार जबाबदार नसून त्याला जिल्हा बँकेनेच खोडा घातलेला आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी जी पीकविम्याची रक्कम भरली आहे. त्याबाबतची माहिती जिल्हा बँकेने वेळेवर पीकविमा कंपनी न दिल्यामुळे शेतकर्‍यांच्या हातात पेरणीपूर्वी पीकविमा मिळाला नसल्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री निलंगेकर यांनी यावेळी दिले.


Comments

Top