HOME   लातूर न्यूज

हमिद दलवाईंनी शतकाचे काम एका दशकात केले- डॉ. तांबोळी

मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथांना कडाडून विरोध केला


हमिद दलवाईंनी शतकाचे काम एका दशकात केले- डॉ. तांबोळी

लातूर: मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथांना कडाडून विरोध करण्याचे धैर्य दाखवून मुस्लिम समाजाच्या प्रबोधनाचे शतकाचे काम एका दशकांत करण्याची किमया हमीद दलवाई यांनी केली असे प्रतिपादन मुस्लिम सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी केले.
लातूर येथील स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात डॉ. तांबोळी बोलत होते. मानवतावादी हमीद दलवाई यांचे कार्य या विषयावर व्याख्यान आणि वृत्तचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांत अभिनेत्री ज्योती सुभाष यांची निर्मिती असलेले 'हमीद : द अनसंग ह्युमॅनिस्ट ' हे वृत्तचित्र दाखविण्यात आले.
व्याख्यानाच्या प्रारंभीच त्यांनी हमीद दलवाई यांना समजून घेण्यासाठी मनं मोकळी आणि पाट्या कोऱ्या असल्या पाहिजेत असे स्पष्टपणे नमूद केले. मुस्लिम समाजात सुधारणा करणारे वादळ म्हणजे हमीद दलवाई असे ते म्हणाले. हमीद दलवाई यांना मुस्लिम समाज जुन्या, पारंपारिक विचारसरणीतून बाहेर यावा, प्रगत व्हावा असे वाटत असे. मुसलमानांच्या एका हातात संगणक आणि दुसऱ्या हातात भारतीय संविधान असावे असे दलवाई यांना वाटायचे असे तांबिळीम्हणाले. सार्वजनिक जीवनात धर्माचा वावर कमीत कमी असावा अशी दलवाईंची धरणा होती.
सर्वप्रथम मी भारतीय आहे, त्यानंतर भारतीय आहे व त्यानंतरही भारतीयच आहे असे बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. तर सर्वप्रथम मी माणूस आहे, त्यानंतर भारतीय आहे व त्याच्यानंतर मुसलमान आहे असे हमीद दलवाई म्हणत असत.
नियतीने दलवाई यांना अगदीच अल्प आयुष्य प्रदान केले होते. अवघ्या ४५ व्या वर्षी आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. पण तरीही मुस्लिम समाज दोन पावले तरी पुढे गेला पाहिजे असे कार्य हमीद दलवाई यांनी त्यावेळी स्वधर्मियांचा विरोध पत्करून केले.
महिलांना हीन वागणूक देणाऱ्या कुप्रथा सोडून दिल्या पाहिजेत. सर्व जाती - धर्माना जोडले तरच समाजाचा गाडा सुरळीत राहून सर्वांची उन्नती होईल याकरिता दलवाई सदैव आग्रही राहिले. मुस्लिम महिलांचे 'तलाक' प्रथेमुळे होणारे हाल पाहून ते कमालीचे व्यथित होत असत. त्याकडे लक्ष वेधून तो कायदा बदलावा याकरिता त्यांनी ११ एप्रिल १९६६ साली मुंबईत तलाक प्रथेच्या विरोधात सात मुस्लिम महिलांचा मोर्चा काढण्याचे धैर्य दाखवले होते. समान नागरी कायदा आणण्याची मागणीही त्यांनी लावून धरली होती. मात्र आजतागायत त्यावर कांहीही झाले नाही अशी खंत डॉ. तांबोळी यांनी व्यक्त केली.
ज्योती सुभाष यांनी हमीद दलवाई यांच्यावर वृत्तचित्र काढण्याबाबतचे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल देऊळगांवकर यांनी केले. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन उमेश खरोसेकर यांनी केले. कार्यक्रमास ख्यानमालेचे अध्यक्ष श्रीनिवास लाहोटी, उपाध्यक्षा सुमती जगताप, मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगांवकर, मनोहरराव गोमारे, व्याख्यानमालेचे सर्व पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top