HOME   लातूर न्यूज

पालकमंत्र्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

आरक्षणाचा निर्णय धाडसी व ऐतिहासिक- रमेशअप्पा कराड


पालकमंत्र्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

लातूर: महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण घोषित केले याबद्दल पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आनंद व्यक्त केला. या आरक्षणाला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी एकमुखी पाठिंबा दिला. ही महत्वाची आणि उल्लेखनीय बाब असल्याचे पालकमंत्री म्हणतात. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या उपसमितीत आपला समावेश करण्यात आला, या ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत भाग घेण्याची संधी मिळाली. याबद्दल पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री आणि राज्य शासनाचे आभार मानले आहेत.
ऐतिहासिक निर्णय - रमेशअप्पा कराड
मराठा आरक्षण विधेयक मंजूर होणे गरजेचे होते. खरोखरच मराठा समाज पिछाडीवर गेला होता. मागील आघाडी सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात ज्या अहवालाच्या आधारे आरक्षण मंजूर केले होते. त्याला घटनात्मक दर्जा नसल्याने न्यायालयात टिकले नव्हते. मात्र आताच्या भाजपा सरकारने मराठा समाजाला खऱ्या अर्थाने आरक्षण देण्यासाठी घटनात्मक दर्जा असलेल्या मागासवर्ग आयोगाच्या शिफारशी विधीमंडळात आणून आज एकमुखी विधेयक मंजूर केले. त्यामुळे मराठा समाजाचे हे आरक्षण तमाम मराठा समाजाला न्याय देणारे ठरणार आहे. मराठा समाजास देण्यात आलेल्या १६ टक्के आरक्षणामुळे राज्यातील हजारो युवकांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळणार असून याचा मराठा समाजातील गरीब व वंचितांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर कोणत्याही समाजाच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देण्यात आले असून हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारे असेल. भाजपा सरकारने मराठा समाजास दिलेला शब्द पाळला असून मराठा आरक्षण हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धाडसी व ऐतिहासिक निर्णय आहे अशी प्रतिक्रिया भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांनी दिली.


Comments

Top