HOME   लातूर न्यूज

मुख्यमंत्री हेच शिवरायांच्या विचारांचे खरे पाईक -अभिमन्यू पवार

आरक्षण देऊन शिवरायांच्या विचारांचे खरे पाईक असल्याचे दाखवून दिले!


मुख्यमंत्री हेच शिवरायांच्या विचारांचे खरे पाईक -अभिमन्यू पवार

लातूर: छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन अनेक नेते व विविध पक्ष राजकारण करतात.सर्व समाजांना न्याय देणे ही शिवाजी महाराजांची भूमिका होती .सर्व जाती धर्माना सोबत घेऊन ते चालत असत .परंतु आजवरच्या राज्यकर्त्यांनी आणि समाजाचे नेते म्हणून वावरणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यानी केवळ नावाचा वापर करून शिवाजी महाराजांची भूमिका विस्मरणात टाकली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मराठा समाजाला आरक्षण देऊन आपण शिवरायांच्या विचारांचे खरे पाईक असल्याचे दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केली.
मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर यासंदर्भात माध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना पवार बोलत होते .ते म्हणाले की, राज्यातील मराठा समाज विविध कारणांनी इतरांच्या तुलनेत मागे पडला होता. या समाजाला सर्वांच्या बरोबर आणण्यासाठी आरक्षण गरजेचे होते. मुळात अनेक वर्षांपासून या समाजाची अवस्था बिकट होती .परंतु आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी आणि समाजाचे नेते म्हणून पद भुषविणाऱ्यांनी हा प्रश्न सोडविला नाही.
आजपर्यंत कॉंग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील नेत्यांनी समाजाला काही दिले नाही. प्रत्येक वेळी हे नेते नुसते बोलत राहिले. विशेष म्हणजे राज्याला जेवढे मुख्यमंत्री मिळाले त्यापैकी बहुतांश नेते मराठा समाजाचे होते. परंतु त्यांनी आरक्षण देण्याचे टाळले, वेळकाढूपणा केला. यामुळेच समाजाचा मागासलेपणा वाढत गेला आक्रोश सुरू झाला. राज्यात ज्या शेतकरी आत्महत्या झाल्या त्यापैकी ९२ टक्के शेतकरी मराठा समाजाचे होते. तरीही आरक्षण न मिळाल्याने समाजाने आंदोलन सुरू केले, मोर्चे काढण्यात आले. आता विरोधी पक्षात बसण्याची पाळी आल्यानंतर याच नेत्यांनी मराठा आरक्षण दिले पाहिजे अशा वल्गना सुरू केल्या. 'जनाची आणि मनाचीही 'सोडुन मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका सुरू केली.
देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने मराठा समाजाला आशेचा किरण दिसल्याने समाजाने त्यांच्याकडे आरक्षणाची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सामाजिक परिस्थितीची बारकाईने पाहणी केली, आरक्षण देण्यासाठी नियोजन केले . मुख्यमंत्री फडणवीस यांना समाजाला आरक्षण द्यायचे होते. त्यासाठी ते कटिबद्ध होते. आरक्षण परिपूर्ण असावे यासाठी ते नियोजन करीत होते. हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकावे तसेच गरजूपर्यंत त्याचा लाभ पोहोचावा यासाठी त्यांनी विविध समित्यांची स्थापना केली. या माध्यमातून कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आरक्षणाचा निर्णय घोषित केला. यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण मिळणार असून या समाजासाठी सोनेरी पहाट उगवणार आहे. मराठा समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन अधिकारी बनू शकणार आहेत. इतरांच्या तुलनेत त्यांच्या बरोबरीचे स्थान मिळवू शकणार आहेत. यामुळे मराठा समाज आणि या समाजातील येणाऱ्या पुढच्या अनेक पिढ्या मुख्यमंत्र्यांचे हे ऋण कधीही विसरू शकणार नाहीत.


Comments

Top