HOME   लातूर न्यूज

जिल्हाधिकारी व आयुक्तांनी असमान निधीवाटप प्रस्ताव फेटाळले

काँग्रेस पक्षाच्या लढ्याचा नैतिक विजय - विक्रांत गोजमगुंडे


जिल्हाधिकारी व आयुक्तांनी असमान निधीवाटप प्रस्ताव फेटाळले

लातूर: लातूर शहर महानगरपालिकेस शासनाकडून विविध योजना अंतर्गत प्राप्त ३० कोटींच्या विकास निधीकरिता कामाची निवड करताना सर्वसाधारण सभेत यादी सादर न करता सत्ताधाऱ्यांनी परस्पर विकास कामांच्या यादी तयार करून राजकीय द्वेषापोटी काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभागात अत्यल्प निधी देत असमान निधी वाटप केला होता. यावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्व सदस्यांनी आक्षेप घेत विरोध दर्शविला होता. याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती तसेच जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांकडे तक्रारही करण्यात आली होती.
दलित वस्ती सुधार, दलितेत्तर, नगरोत्थान, विशेष रस्ता अनुदान व मूलभूत सोयी सुविधा योजनेकरिता ३० कोटीचा निधी उपलब्ध असताना ५२ कोटीच्या विकास कामांची यादी तयार करताना योजनांमध्ये अनुज्ञेय नसलेल्या कामांची निवड करणे व सर्वसमावेशक विकास कामांची निवड झाली नसल्याची दखल घेत जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांनी विकासकामांच्या मंजुरीचे प्रस्ताव फेटाळून लावत नियमानुसार व सर्वसमावेशक कामांची नव्याने निवड सर्वसाधारण सभेत करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. राजकीय आकस ठेवत काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रभागात अत्यल्प निधी देत शहराच्या विकासाचा समतोल ठेवण्यात आलेला नव्हता. सत्ताधाऱ्यांची ही कृती लातूरकरांसाठी अन्यायकारक होती. याबाबत कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत आक्षेप नोंदवत मतदानाची मागणी केली होती. परंतु ही मागणी डावलण्यात आली. याच प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या वतीने उच्च न्यायालयात दाखल याचिकेत उच्च न्यायालयाने मनपास नोटीस बजावत ११ फेब्रुवारी २०१९ पर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी कायद्याचे पालन करत सर्व प्रस्ताव फेटाळल्याने आता नव्याने सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन विकास कामांची निवड करावी लागणार आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांचा मनमानीस चाप बसणार असून काँग्रेस पक्षाच्या लढ्याचा नैतिक विजय झाला आहे अशा आशयाची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे माजी स्थायी समिती सभापती, नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली आहे.


Comments

Top