HOME   लातूर न्यूज

लातूर जिल्हा दुष्काळमुक्त करुन पाणीदार करायचाय

सरकारी इमारतींत छतावरील पाण्याचे पुनर्भरण करा- पालकमंत्री निलंगेकर


लातूर जिल्हा दुष्काळमुक्त करुन पाणीदार करायचाय

लातूर: जिल्हयात जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी झाल्याने जिल्हा टंचाईमुक्त झालेला आहे. इंद्रप्रस्थ जलयुक्ती अभियानाच्या माध्यामातून पंचनिष्ठ कार्यक्रमाची कार्यक्षमपणे अंमलबजावणी करून लातूर पूर्णपणे दुष्काळमुक्त करून पाणीदार व्हावा याकरिता शासकीय यंत्रणांनी सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे कामगार कल्याण, कौशल्य विकास, भुकंप पुर्नवसन व माजी सैनिक कल्याणमंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित इंद्रप्रस्थ जलभुमी अभियानांतर्गत आढावा बैठकीत पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी आमदार ॲड. त्र्यंबक भिसे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, जिल्हा उपनिबंधक सामृत जाधव आदींसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, इंद्रप्रस्थ जलभुमी अभियांनातर्गत इमारतीच्या छतातील पाण्याचे पुर्नभरण, बोअरवेल पुर्नरभरण विहिर पूर्नभरण, घरोघरी शोषखडेृ घर तिथे झाड हे पाच कार्यक्रम राबविण्यात येऊन जिल्हा पाणीदार करावयाचा आहे. या उपक्रमात सर्व शासकीय यंत्रणांनी कार्यक्षमपणे सहभाग नोंदवून व इतर नागरिकांना ही प्रबोधित करावे, असे त्यांनी सांगितले. जलपुर्नभरणाच्या कामाची सुरूवात स्वत:पासून व्हावी याकरिता सर्व शासकीय विभागप्रमुखांनी शासकीय इमारतीच्या छतावरील पाण्याचे जलपुर्नभरण प्रथम करावे व त्यानंतर आपल्या अधिनस्त कार्यालये व नागरिकांना जलपुर्नभरणबाबत प्रबोधन करण्याची सूचना निलंगेकर यांनी केली. महापालिकेने या अभियानात अधिक सक्रीयतेने काम करणे आवश्यक आहे. कारण टंचाईच्या सर्वात जास्त झळा लातूर शहरातील नागरिकांना पोहोचल्या आहेत. तसेच प्रत्येक अधिकारी, कर्मचारी व नागरिकांने आपल्या अंतकरणातून जलभुमी अभियानात सक्रीय सहभाग दिल्यास पुढील काळात संपूर्ण लातूर जिल्हा पाणीदार होण्यास मदत मिळेल व दुष्काळी जिल्हा हा आपला कलंक कायमस्वरूपी जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सात-बारा वर बोअरवेल व विहीरींची नोंद घ्यावी. तसेच प्रत्येक बोअरवेल व विहीर धारकांने जलपुर्नभरण केले जाईल यासाठी त्यांचे प्रबोधन करण्याची सूचना जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केली. यावेळी वनविभागाने वृक्ष लागवड, कृषी विभागाने सिंचन विहीर व जलसंधारणाचे इतर उपचार, भूजल विभागाने भुजल अधिनियम २००९ व मुख्य कार्यकारी अधिकारी ईटनकर यांनी रुप वॉटर हार्वेस्टिींग व शोषखडडे आदिची माहिती बैठकीत सादर केली. तर आमदार भिसे यांनी इंद्रप्रस्थ जलभुमी अभियानाच्या माध्यमातून लातूर जिल्हा कायमस्वरूपी दुष्काळ मुक्त करण्यासाठी पालकमंत्री प्रयत्नशील असल्याबद्यल त्यांचे अभिनंदन केले व सर्व यंत्रणांनी बैठकीतील सुचनांचे पालन करण्याचे त्यांनी सांगितले.


Comments

Top