लातूर: महाराष्ट्रात एकीकडे अनेक साखर कारखाने अवसायनात निघत असताना, विकले जात असताना, जप्त होत असताना लातुरचे आमदार अमित देशमुख यांनी ट्वेंटी वन शुगर्स कारखान्याच्या उभारणीस सुरुवात केली आहे. याची घोषणा होताच शेतकर्यांनी उत्साहाने प्रतिसाद देणं सुरु केलं. या निमित्ताने आज आम्ही आ. अमित देशमुख यांच्यांशी संवाद साधला.
दोन वर्षात चांगला पाऊस झाला, ऊसाची विक्रमी लागवड होत आहे. लातूर तालुक्यात आणखी एक कारखाना असावा असं अनेकांना वाटत होते. शेतीमालांच्या भावात मोठी घसरण होते आहे. ऊसाच्या भावाला कायद्याचा आधार आहे. या पिकाच्या माध्यमातून चार पैसे पदरात हमखास पडतील असं शेतकर्यांनाही वाटतं. म्हणून ट्वेंटीवनचा उपक्रम आता मूर्तरुप घेत आहे. कमीत कमी पाणी, कमीत कमी मनुष्यबळ, संपूर्ण संगणकीकृत व्यवस्था आणि अत्याधुनिक यंत्रणा या प्रकल्पात असेल. वीज निर्मिती, इथेनॉल असे उपक्रमही राबवले जाणार आहेत. जे ऊस उत्पादक कुठल्याही कारखान्याचे सभासद नाहीत. अशा सभासदांसाठी हा हक्काचा कारखाना असेल. जिल्ह्यातल्या कुठल्याही ऊस उत्पादक शेतकर्याला याचा आधार मिळेल असा विश्वास आ. अमित देशमुख यांनी व्यक्त केला.
Comments