HOME   टॉप स्टोरी

आरक्षण हवे घटनेप्रमाणेच, पवारांचे मत वैयक्तिक- अशोक चव्हाण

सर्वांची मतं आजमावणं सुरु, राष्ट्रवादीच्या आघाडीबाबतचा निर्णय घेतील राहूल गांधी!


लातूर: भारतीय राज्य घटनेने सूचित केल्याप्रमाणे सगळी आरक्षणं अबाधित राहिली पाहिजेत. आर्थिक निकषावर आरक्षण द्यायला हवं हे शरद पवार यांचं मत वैयक्तिक आहे असे प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी स्पष्ट केले. कार्यकर्ता मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिवराज पाटील चाकूरकर, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, आ. दिलीपराव देशमुख, तुकाराम रेंगे पाटील, आ. अमित देशमुख, आ. त्र्यंबक भिसे, आ. बसवराज पाटील मुरुमकर, ललितभाई शहा, व्यंकट बेद्रे, अशोकराव पाटील निलंगेकर, धीरज देशमुख, शिवाजी पाटील कव्हेकर उपस्थित होते.
निवडणुका जवळ आल्यानं सगळ्यांनीच तयारी सुरु केल्यानं राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीचा विषय निघालाच. राष्ट्रवादीशी आघाडी करावी की करु नये याबद्दल कार्यकर्त्यांचं मत काय आहे असा प्रश्न विचारला असता, वेगवेगळ्या ठिकाणची मते वेगवेगळी आहेत, काही ठिकाणी करा म्हणतात, काही ठिकाणी नको म्हणतात. शिबिरांच्या माध्यमातून आम्ही सर्वांची मते जाणून घेत आहोत, अद्याप यावर अजून काही नक्की झाले नाही. काही राज्यात भाजपला सत्ता मिळाली असं होत राहतं. राज्यात मोठ्या प्रमाणावर शाळा बंद केल्या जात आहेत, शालेय शिक्षणाबाबतचा त्यांचा विचार सकारात्मक दिसत नाही. इकडे शाळा बंद अन तिकडे मोठ्या प्रमाणावर दारुची दुकाने उघडली जात आहेत. शासनाची प्राथमिकता कशाला आहे? शाळा बंद करणे आणि दारुची दुकाने उघडणे असा प्रकार चालू आहे. लातुरचं महिला तंत्रनिकेतन बंद करण्याचा प्रयत्न सुरु आहे, शिष्यवृत्त्या रद्द केल्या जात आहेत कारण सरकारकडे पैसाच नाही, नुसत्याच घोषणा केल्या जातात असेही चव्हाण म्हणाले.
बोंड अळीचं प्रकरण, शेतकर्‍यांच्या गळ्यात पाट्या लावून सर्वे करतात अन दुसरीकडे नीरव मोदीसारखे व्यापारी लूट करुन पळून जातात, शेतकर्‍यांच्या कर्जमाफीतला खोटेपणा, शिष्यवृत्तीचा प्रश्न, बेरोजगारी, सामाजिक सलोखा, जातीय सलोखा, भिमा कोरेगाव, मंत्रालयात जाळ्या लावण्याची वेळ सरकारवर आली, अशा जाळ्या कोठे कोठे लावणार अशा अनेक प्रश्नांवर चव्हाण यांनी आपली मते व्यक्त केली. सकाळी कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. सोशल मिडियावर चर्चा, कार्यकर्त्यांची मनोगते जाणून घेणे असे कार्यक्रम पार पडले.


Comments

Top