HOME   टॉप स्टोरी

लातुरकरांना दोनवेळा पाणीपुरवठा अशक्य, पाणीपुरवठ्याचा पंचनामा

उपसा क्षमता नाही, अमृतचे काम धड नाही, कधी तुरटी नसते तर कधी ब्लिचिंग!


लातूर: लातूर आणि पाण्याचं काहीतरी वाकडं असावं. १९९५ पासून याचा प्रत्यय येतो. ९५ मध्ये लातुरकरांनी दर १५ दिवसांनी रात्री १२ वाजता पाणी भरले. तेव्हापासून सतत हाल सुरु आहेत. काही काळ मजिप्राने हे योजना चालवली. अनधिकृत कनेक्शन अधिकृत करुन घेतले, बरं चाललं होतं, त्यात कंपनी आली आणि सगळाच बट्ट्याबोळ झाला. नंतर रेल्वेनं पाणी आणेपर्यंत, डोंगरगावला पोलिस बंदोबस्त लावण्यापर्यंत झालेले हाल ताजेच आहेत. आता या दोन वर्षात धरण भरले, पाणीही सोडले, पण नागरिकांच्या नळाला मात्र नियमित पाणी येत नाही. एकदा तुरटी शिल्लक नसल्याने पाणी पुरवठा झाला नाही. एकदा ब्लिचिंग आणि क्लोरिन नसल्यानं पाणी असूनही मिळाले नाही. सोलापूर आणि उस्मानाबादहून ते मागवले आणि पुरवठा सुरु झाला. याच वेळेपासून नळाला काही काळ लाल पाणी आले. याच काळात सत्ताधारी सहलीला गेले अन लोकांना ‘पिवळ्या पाण्या’ची शिक्षा मिळाली. आजलातूरने हा विषय चव्हाट्यावर आणला आणि बाकी माध्यमांनी तो प्रश्न उचलून धरला. अखेर प्रशासनाने हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्राचे प्रमुख अभियंता बिराजदार यांना बदलून त्यांच्या जागी विजय चोळखणे यांची नियुक्ती केली. आता बर पाणी मिळत आहे. काय म्हणतात चोळखणे????
पाण्याचा पिवळा रंग घालवण्यासाठी पीएसी पावडर वापरतोय, त्यामुळं चांगलं पाणी येतंय, ब्लिचिंग नसल्यामुळे एकदोन वेळा अडचण आली होती आता ब्लिचिंग आणि क्लोरिंगचा चांगला साठा आहे. सध्या एकवेळ पाणी देणे कसेबसे जमते पण आपली उपसा क्षमता पुरेशी नसल्याने दोनवेळा पाणी देणे शक्य होत नाही. अमृत योजनेतून बंद पडलेला वरवंटीचं जल शुद्धीकरण दुरुस्त झाल्यास फायदा होईल, यासोबतच अमृत योजना पूर्ण झाल्यानंतर दोनवेळा पाणी देणे शक्य होईल. पाणी पुरवठ्याची वाढती गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत
नवा डीपीआर तयार केला जात आहे. योजनेची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी माहिती विजय चोळ्खणे यांनी दिली.


Comments

Top