HOME   लातूर न्यूज

मारूती महाराज कारखाना पुन्हा सुरु करणार

आमदार अमित देशमुख यांचे सभासदांना पत्र


मारूती महाराज कारखाना पुन्हा सुरु करणार

लातूर : श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरु झाली आहे. बंद असलेला हा कारखाना पुन्हा सुरु झाला पाहिजे, या भागातील ऊस उत्पादक शेतकरी जगला पाहिजे, वाचला पाहिजे ही भूमिका घेऊन लोकाग्राहास्तव विकासरत्‍न विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून ही निवडणूक लढविण्याचा निर्धार केला असल्याचे माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी कारखान्याच्या सर्व सभासदांना पत्राद्वारे निवडणूक लढवण्यामागची भूमिका मांडली आहे.
आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शेतकरी सभासदांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, लातूर जिल्हयाचा समतोल विकास साधला जावा म्हणून आदरणीय विलासराव देशमुख यांनी या कारखान्याच्या उभारणीला परवानगी देऊन सर्वतोपरी सहकार्य केले होते. ज्यांच्यावर कारखाना उभारण्याची जबाबदारी होती. त्यांनी अत्यंत जलद गतीने केवळ ११ महिने करखान्याची उभारणी केली. प्रारंभी कारखान्याची वाटचाल कौतुकास्पद होती. त्यानंतर मात्र काही प्रमाणात नैसर्गिक आणि काही प्रमाणात मतभेदाच्या कारणातून अडचणीत आलेला हा कारखाना मांजरा परिवाराबाहेर गेला. औसा तालुक्याचे अर्थकारण अवलंबून असलेला हा कारखाना सुरळीत चालला नाही, पुढे तो बंद पडला. यामुळे त्या परिसरातील शेतकरी, शेतमजूर, कामगार हे सर्वच घटक अडचणीत आले आहेत. ग्रामीण भागाबरोबरच शहरातील उद्योग व्यवसायावरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे तालुक्याच्या एकूण विकास प्रक्रियेला खीळ बसली आहे. वास्तविक पाहता संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या या परिसरात एक साखर संकुल उभे राहण्याची क्षमता आहे. वीज, इथेनॉल निर्मितीचे आणि त्याचबरोबर बायो रिफायनरी असे अनेक प्रकल्प येथे सुरु होऊ शकतात. एवढा मोठा वाव असलेला, सर्वच घटकांना न्याय देऊ शकणारा हा प्रकल्प पारदर्शक कारभार करुन चालवणे गरजेचे आहे. त्यामुळे मागचा पुढचा विचार नसलेल्या मंडळींनी या कारख्यान्याची निवडणूक लढवावी हे योग्य ठरणारे नाही. त्यासाठी असे प्रकल्प चाल‍विण्याचा अनुभव, इतिहास, परंपरा ज्यांच्याकडे आहे त्यांनीच या प्रक्रियेत उतरणे गरजेचे वाटते त्यासाठी लोकांच्या प्रश्नांची जाण असणे त्याग करण्याची तयारी ठेवणे हे गरजेचे ठरते, आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्या संस्काराप्रमाणे आदरणीय दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हा बँक, मांजरा परिवारातील सर्व साखर कारखाने जिल्हयातील असंख्य इतर सहकारी संस्था इतरांनी आदर्श घ्यावा अशा पध्दतीने चालविल्या जात आहेत. तोच वसा आणि वारसा घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरलो आहोत.
या ठिकाणी मागे काय झाले याचा विचार न करता, उमेदवार म्हणून नवीन चेहऱ्यांना संधी देत लोकांच्या समोर जाण्याचा निर्धार आम्ही केला आहे. हे सर्व नवखे उमेदवार शेतकरी कुटुंबातील आहेत, होतकरू आहेत. आगामी काळात हा कारखाना त्यांना चांगल्या पध्दतीने चालवायचा आहे, तो कर्जमुक्त करावयाचा आहे, येथे नव-नवे प्रकल्प उभे करावयाचे आहेत, शेतकऱ्यांच्या सुशिक्षित मुलांसाठी स्वावलंबी योजना राबवायच्या आहेत, हे सर्व घडण्यासाठी शेतकरी सभासदांनी पक्का विचार करुन या नव्या टीमला निवडून द्यावे असेही त्यांनी म्हटले आहे.
आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या दोन सभा
श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवार १७ आक्टोबर रोजी माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या औसा तालुक्यात कारखाना कार्यक्षेत्रात दोन जाहीर सभा होणार आहेत. बुधवारी सकाळी ९.३० वाजता जवळगा गटातील नागरसोगा येथे तर सांयकाळी ६ वाजता आशिव येथे सभा होणार आहे. या सभांना सर्व शेतकरी सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


Comments

Top