HOME   लातूर न्यूज

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हयातील शेतकऱ्यांना पुरस्कार

५८ शेतकर्‍यांचा आदर्श शेतकरी म्हणून सन्मान


पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हयातील शेतकऱ्यांना पुरस्कार

लातूर: बलदत्या काळानुसार एकटयाने शेती करणे शेतकऱ्यांना अवघड जात आहे. तसेच बदलते हवामान, बाजारपेठ यामुळे शेतीचं उत्पन्न कमी होत आहे.परंतु एका गावातील व परिसरातील शेतकरी गटागटांनी एकत्रीत येऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना केल्यास त्यातून बदलते हवामान,पिक पध्दती, बाजारभाव, व माकेंटिंगचे तंत्र अवगत होऊन शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल, त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना होणे ही काळाची गरज असल्याचे मत कामगार कल्याण, कौशल्य विकास,भूकंप पुर्नवसन व माजी सैनिक कल्याणमंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केले.
येथील कै. दगडोजीराव देशमुख सभागृहात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने आयोजित आदर्श शेतकरी पुरस्कार 2018-19 च्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे,आमदार विनायक पाटील, रामचंद्र तिरुके, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर, बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, महिला व बालकल्याण सभापती संगीता घुले, कृषि व पशुसंवर्धन सभापती बजरंग जाधव, विभागीय कृषि सहसंचालक टी.एम.जगताप, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष आळसे, आत्माचे प्रकल्प संचालक दिनकर जाधव, जिल्हा कृषी विकास अधिकारी भिमराव रणदिवे तसेच पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, सध्याच्या काळात एकटयाने शेती करणे नुकसानकारक ठरत असून गटानी शेती करणे फायदयाचे ठरत आहे. त्याममुळे लातूर जिल्हयातील शेतकऱ्यांनी एकत्रीत येऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करावी. अशा कंपन्यांना शासनाकडून प्रत्येकी एक कोटींचे अर्थ सहाय्य देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. बदलत्या काळानुसार जमिनीतून चांगले उत्पादन मिळण्यासाठी जमीनीचा पोत ही चांगला राहिला पाहीजे. व जमीनीचा पोत दर्जेदार ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे श्री. निलंगेकर यांनी सांगितले. तसेच मागील चार वर्षात केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांना शेतीसाठी विविध पायाभूत सुविधा निर्माण करुन दिलेल्या आहेत. त्याप्रमाणेच विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मोठया प्रमाणावर अनुदान जमा करण्यात आलेले असल्याचे त्यांनी सांगितले.


Comments

Top