HOME   लातूर न्यूज

भाजपा लोकसभेच्या ३५० जागा जिंकेल- तोरसेकर

देशात महागठबंधन झाले तर मोदींचा प्रभाव अधिक यशस्वी ठरेल


भाजपा लोकसभेच्या ३५० जागा जिंकेल- तोरसेकर

लातूर: मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्याअगोदरच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे ३३२ उमेदवार पहिल्या - दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे आपण ३३२ पैकी २७५ जागांवर विजयी होईल असे गणित आपण २००९ च्या निवडणुकीत मांडले होते. यावेळची परिस्थिती अशी आहे की, भाजपाला लढण्यासारख्या ४१० ते ४२० जागा आहेत. त्यापैकी भाजपाला ३०० जागांवर विजय मिळू शकतो. देशात मोदींविरोधात सर्वपक्षीयांनी एकत्रित येऊन महागठबंधन केले तर मात्र भाजपा आगामी लोकसभा निवडणुकीत ३५० जागांवर जिंकू शकेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केले.
भाऊ तोरसेकर लिखित व मोरया प्रकाशन द्वारा प्रकाशित करण्यात आलेल्या 'पुन्हा मोदीच का?’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन दयानंद सभागृहात माजी खासदार श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी भाऊ तोरसेकर बोलत होते. यावेळी लातूर लोकसभेचे प्रभारी मिलिंद पाटील, मोरया प्रकाशनचे दिलीप महाजन, स्काय फाऊंडेशनचे प्रवीण सावंत, मनपाचे स्थायी समिती सभापती तथा पंडित दिनदयाळ फाऊंडेशनचे शैलेश गोजमगुंडे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय लष्कराच्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश गोजमगुंडे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली.
यावेळी आपले विचार व्यक्त करतांना भाऊ तोरसेकर म्हणाले की, कोणतीही लढाई सेनापती कणखर असेल तर जिंकणे शक्य आहे. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर कोणतीही लढाई जिंकता येते. आपल्या मनोगतात त्यांनी राजकीय वा निवडणूक विषयांवर चर्चा करणारे लोक मतदानालाच जात नसल्याचे सांगितले. तर ९२ - ९३ टक्के मतदान करणारे गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील मूलभूत सुविधांपासून वंचित राहणाऱ्या लोकांकडून लोकशाही जागविण्याचे काम केले जाते, असे सांगून त्यांनी बुद्धिमत्तांची समस्या ही असते की ते फार चिकित्सक असतात, असे मत व्यक्त केले. जीवनात छोट्या - छोट्या गोष्टीतून आयुष्य शिकता येते.समाजात वावरताना सत्य स्वीकारता आले पाहिजे. आजच्या बदलत्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करतांना त्यांनी समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादवानी आगामी निवडणुकीत मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत, असे बोलून आधुनिक श्रीकृष्णाची भूमिका वठवल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मध्यातून निवडणूक लढविण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे आपणही पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतील एक चेहरा आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसमुक्त भारताची संकल्पना नरेंद्र मोदींची नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची असल्याचे उदाहरणासह सांगितले.


Comments

Top