HOME   टॉप स्टोरी

१९ च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसह समविचारी एकत्र येऊ- बाळासाहेब थोरात

गुजरात निवडणुकीतून धडा, जनता सरकारवर नाखूष, विलासरावांच्या आठवणींना उजाळा, आदरभावही व्यक्त


लातूर: केंद्रात आणि राज्यात भाजपाचे राज्य आहे. नंतरच्या जवळपास सगळ्याच निवडणुकात भाजपाने बाजी मारली. परवा झालेल्या गुजरातच्या निवडणुकीतही कॉंग्रेसला पराभव स्विकारावा लागला. या पार्श्वभूमीवर २०१९ ची निवडणूक येऊ घातली आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसला यश हवे आहे यासाठी काय समीकरण असेल असा प्रश्न राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारला असता, राष्ट्रवादीसह सगळे समविचारी पक्ष एकत्र येऊ असे उत्तर त्यांनी दिले. लातूर बाजार समितीच्या सभागृहात आज कॉंग्रेसच्या नूतन सरपंच, उप सरपंचांचा सत्कार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बाळासाहेबांनी यावेळी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला. विलासरावांकडून मला आधार, प्रेम, जिव्हाळा सगळं काही मिळाला असं ते म्हणाले.
महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये सरकारबद्दल प्रचंड असंतोष आहे. जनता कंटाळली आहे. शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य लोक नाखूष आहेत. आता १९ च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसह सर्व समविचारी पक्षांना एकत्र यावे लागेल. त्याची पूर्वतयारी सुरु आहे. गुजरात निवडणुकीत अपेक्षेइतके यश कॉंग्रेसला मिळाले नाही. राष्ट्रवादी आणि समविचारी पक्षांसोबत उच्च स्तरावर बोलणी सुरु आहे अशीही माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली. यावेळी आ. अमित देशमुख, त्र्यंबकनाना भिसे, धीरज देशमुख, वैजनाथ शिंदे, त्र्यंबकदास झंवर, मोईज शेख, ललितभाई शहा, विक्रम हिप्परकर, अशोक गोविंदपूरकर, दगडूसाहेब पडीले उपस्थित होते. या पत्रकार परिषदेनंतर सरपंच, उप सरपंचांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


Comments

Top