मुंबई: निसर्गाच्या कृपेने मागच्या दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. याचा लाभ शेतकर्यांनी घेत मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली. मात्र साखर कारखान्याच्या मनमानीमुळे अनेक शेतकर्यांचे ऊस गाळप होत नाही. ही बाब लक्षात घेऊन राज्याचे कामगारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शेतकर्यांच्या हिताला प्राधान्य देण्यासाठी कारखान्यानी राज्याबाहेरील ऊस गाळप करु नये अशी मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली. या मागणीवर मंत्रिमंडाळातील सदस्यांनी समंती दर्शवली असल्याने कारखान्याने कार्यंक्षेत्राबाहेरील ऊस गाळप करु नये असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अनेक साखर कारखाने कार्यक्षेत्र सोडून राज्याबाहेरील ऊस गाळप करत असल्याच्या तक्रारी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे जिल्हा दौर्यादरम्यान शेतकर्यांनी केल्या होत्या. तसेच मराठवाड्यातीलही अनेक शेतकर्यांनी अश्याच प्रकारच्या तक्रारी केल्या होत्या. कारखान्याच्या या मनमानीमुळे अनेक शेतकर्यांचे ऊस वेळेत गाळप होत नसल्याने शेतकर्याचे नुकसान होत आहे. शेतकर्यांच्या हिताला प्राधान्य देवून त्यांचे नुकसान होऊ नये ही बाब लक्षात घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय चर्चेत आणला. कारखान्याच्या या मनमानीला लगाम घालून शेतकर्यांचे हित साधले जावे यासाठी कारखान्यांनी राज्याबाहेरील ऊस गाळप करु नये असा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला होता.
Comments