HOME   महत्वाच्या घडामोडी

०६ हजार गावे दुष्काळमुक्त करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसंधारण कामांची पाहणी करून त्यांनी श्रमदान केले

०६ हजार गावे दुष्काळमुक्त करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सांगली: महाराष्टाला दुष्काळमुक्त करण्याच्या निर्धाराने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून आतापर्यंत राज्यातील ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. यावर्षी ०६ हजार गावे दुष्काळमुक्त करायची आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जत तालुक्यातील आवंढी येथील भटकीमळा डोंगर परीसरात पाणी फौंडेशन आणि लोकसहभागातून करण्यात येत असलेल्या जलसंधारण कामांची पाहणी करून त्यांनी श्रमदान केले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, पाणी फौंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, भारतीय जैन संघटनेचे प्रमुख शांतीलाल मुथा आदि मान्यवर उपस्थित होते. राज्याचा ५० टक्के भाग दुष्काळाने होरपळत होता, या दुष्काळग्रस्त भागाला जलयुक्त शिवारच्या माध्यमातून दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठ्या धरणांच्या बरोबरीने जलसंधारणाच्या प्रणालीद्वारे ही गावे दुष्काळमुक्त करण्यास शासनाने प्राधान्य दिले असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग वाढविल्याने लोकांना ही कामे आपली वाटू लागली आहेत. त्यामुळे गावागावात जलसाठे निर्माण होवू लागले. राजकारण, गट-तट बाजूला सारुन लोकं पाण्यासाठी एकत्र येऊ लागली आहेत. गावात पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब गावाच्या मालकीचा आहे, ही मानसिकता गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली असून जलसंधारणाच्या कामात निसर्गाला समजावून घेवून गावकऱ्यांनी काम केल्याने दुष्काळमुक्तीचा मार्ग सुकर झाला आहे.


Comments

Top