HOME   लातूर न्यूज

संभाव्य पाणी टंचाई: उपाय योजनांबाबत लातूरकरांनी सूचना द्याव्यात- शैलेश गोजमगुंडे

केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता लोकजागृतीतून तोडगा काढायला हवा

संभाव्य पाणी टंचाई: उपाय योजनांबाबत लातूरकरांनी सूचना द्याव्यात- शैलेश गोजमगुंडे

लातूर: यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे मांजरा धरणातील पाणी साठा कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर लातूर शहर महापालिकेच्या वतीने पाणी वापरासंदर्भात आराखडा तयार करण्यात येतोय. या संदर्भात मनपा स्थायी समितीची बैठक पाणी नियोजनाच्या विषयात आयोजीत करण्यात येणार आहे. यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक व जागरुक लातूरकरांनी आपापल्या सुचना स्थायी समितीकडे द्याव्यात, असे आवाहन स्थायी समिती सभापती अॅड. शैलेश गोजमगुंडे यांनी केले आहे.
पाणी आणि लातूर हे समीकरण कायम आहे. कुठल्याही नैसर्गिक ‍आपत्तीच्या संभाव्य धोक्याआधीच आपण तयारीत असलं पाहिजे. केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता लोकजागृतीतूनच आपण अशा समस्यांवर तोडगा काढायला हवा. याच पार्श्वभूमीवर सकल लातूरकरांनी या जटील प्रश्नात एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. मनपा प्रशासन यासाठी तत्पर आहे. परंतु या विषयातील अनेक अभ्यासू व जागृत नागरिक लातूर शहरात राहतात. त्यांनीही येत्या उन्हाळ्यात पाणी व पाण्याचा वापर, वितरण, बचत याविषयी मनपातील स्थायी सभापती कार्यालयात येत्या तीन दिवसात लेखी सूचना द्याव्यात. जेणेकरुन प्रसाशनाला पाण्याच्या नियोजनासंदर्भात योग्य त्या सूचना देण्यात येतील, असे स्थायी समिती सभापतींनी कळवले आहे.


Comments

Top