HOME   टॉप स्टोरी

भाजपा सत्तेच्या नशेत बेधुंद, सामान्यांचा विसर

येणार्‍या निवडणुकीत त्यांना जवाब द्यावा लागेल- आ. अमित देशमुख

भाजपा सत्तेच्या नशेत बेधुंद, सामान्यांचा विसर

लातूर: भारतीय जनता पक्षाची सारीच मंडळी सत्तेच्या नशेत बेधुंद झाली आहे. त्यांना सामान्य माणसाचा विसर पडला आहे. कर आणि भाडे अनेकपटीने वाढवण्यात आले आहेत. वाढ असावी पण ती नैसर्गिक असावी असे मत आ. अमित देशमुख यांनी सांगितले. लातूर मनपाने लादलेला अवाजवी गाळे भाडेवाढ आणि अवाजवी मालमत्ता कर थांबवावेत आणि नव्याने दर ठरवावेत. सर्वसमावेशरित्या फेरीवाला धोरण अमलात आणावे या मागणीसाठी मनपाच्या विविध व्यापारी संकुलातील गाळेधारक आणि लातूर शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने आज लातूर मनपावर मोर्चा काढण्यात आला.
हजाराहून अधिक संख्येनं आलेला हा मोर्चा मनपाचे कर्मचारी मुख्य प्रवेशद्वारावर अडवू शकले नाहीत. मोर्चेकर्‍यांनी प्रांगणातच बैठक मारली. या ठिकाणी आ. अमित देशमुख, अशोक गोविंदपूरकर, मोईज शेख, दीपक सूळ, गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले.
लातूर शहरातील मनपा गाळेधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. व्यापार्‍यांनी भाडेवाढ मान्य नाही. रेडीरेकनर कसा काढला, तो कोणत्या वर्षाचा आहे, बांधकामाचे वर्ष गृहेत धरुन त्याचा घसाराही देण्यात आला नाही. संकुलातील आतील दुकानांना वेगळे आणि रस्त्यावरील दुकानांना भाडे आकारले जात आहे. भाड्यात १० ते १५ पट वाढ करण्यात आली आहे. या धक्क्याने एका व्यापार्‍याचा मृत्यूही झाला. व्यापार्‍यांशी विचार विनिमय करुन नवे दर ठरवावे, तोपर्यंत जुन्या दराने वसुली करावी, नुकतीच न्यायालयानेही मालमत्ता करवाढीस स्थगिती दिली आहे. असेही यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी खालच्या पायर्‍यांवर येऊन आमदारांच्या हस्ते निवेदन स्विकारले. यावेळी रईस टाके, सीएच आळंदकर, दिनेश गिल्डा, शब्बीर बागवान, विश्वास देशमुख, प्रकाश टेंकाळे, मोईज शेख, सपना किसवे, स्मिता खानापुरे, विक्रांत गोजमगुंडे, गौरव काथवटे, कैलास कांबळे, रुपीन शेठ, कुमार पारशेट्टी, चंद्रकांत उरगुंडे, ज्ञानोबा पेठकर यांच्यासह अनेक गाळेधारक आणि कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments

Top