HOME   लातूर न्यूज

मोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा

शेतकर्‍यांच्या किमान अपेक्षांकडे दुर्लक्ष करणारा, खोटी स्वप्न रंगविणारा, थापाड्या माणूस

मोदी म्हणजे  गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा

बाळ होळीकर, लातूर: मतदानातून जन्माला येणारे नेते मस्तवाल निघाले तर त्यांना दर पाच वर्षाने मातीत लोळवायचे, मताचे अमोघ शस्त्र बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला बहाल केले आहे, त्यामुळे देशातल्या मतदारांनी कोणत्याही दबाव, अमित शहा वा दहशतीला बळी न पडता निर्भयपणे येत्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आवर्जून मतदान करा, असे आवाहन करुन, मोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा,देशाचा पोशिंंदा असलेल्या शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे साफ दुर्लक्ष करणारा,तरुणांना खोटी स्वप्ने दाखविणारा,प्रचंड थापाड्या माणूस असल्याचे विष्लेषण भाषातज्ञ डॉ.गणेश देवी यांनी येथे केले.
भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेच्यावतीने रविवार,दि.१७ मार्च २०१९ रोजी दयानंद शिक्षण संस्थेंच्या सभागृहात आयोजित संविधान गौरव परिषदेत भारतीय संविधानः भटके विमुक्त बहुजन आणि आजचे वास्तव या विषयावर मार्गदर्शन करताना उद्घाटक म्हणून डॉ.देवी बोलत होते.या परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत तथा विचारशलाकाचे संपादक डॉ.नागोराव कुंंभार हे होते.मंचावर दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून विचारवंत धनाजी गुरव होते.मंचावर भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेचे नेेते प्रा.सुधीर अनवले, प्रा.डॉ.शिवाजी जवळगेकर, ऍड.गोमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या देशाचे नाव भारत आहे, या देशात १३० कोटी नागरिक राहतात, त्यात १२ कोटी भटके विमुक्त आहेत,इथे देशाचे पोशिंंदे ७० टक्के शेतकरी आहेत, त्यांना संविधानाने नागरिकत्वाचा हक्क बहाल केला आहे पण या मोठ्या समाज घटकांकडे राज्यसत्तेकडून अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे,म्हणून या घटकांनी आता संविधानाने दिलेल्या मताच्या शस्त्राचा वापर करुन नागरिकत्व शाबूत ठेवावे, मतदानाच्या वेळी स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्‍या शहिदांची आठवण ठेवा,संविधान नाकारणार्‍यांना धडा शिकवा,नाहीतर यापुढे देशात संविधान आणि लोकशाही शाबूत राहणार नाही,देशात निर्माण झालेली विचित्र राजकीय व्यवस्था विचारवंत उघड्या डोळ्याने शांतपणे पाहू शकत नाही, म्हणून आपण स्पष्टपणे बोलतोय असे सागूंन डॉ.गणेश देवी पुढे म्हणाले,मोदी एवढा खोटारडा प्रधानमंत्री झाला नाही,ते त्यावेळी अस्तित्वात नसलेल्या कॉलेजची पदवी उत्तीर्ण झाल्याचे सांगतात, चहा विकला तेव्हा तिथे रेल्वे स्टेशनच नव्हते,देशातला शेतकरी आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या करताना त्याकडे ते गार्ंभीयाने पाहात नाही,तरुणांना ते खोटी स्वप्ने दाखवून फसवतात,ते खोटारडे आहेत, अशी असंख्य उदाहरणे देता येतील, महात्मा गांधी हे ही गुजरातचे त्यांनी सत्य,अहिंसा शिकवली तर मोदी असत्य आणि हिंसा शिकवतो, म्हणून लोकशाही ,संविधानावर विश्‍वास ठेवणारा कोणीही चालेल पण होर्डिंगवर जगणारा मोदी प्रधानमंत्री पुन्हा नको, माझा युगधर्म मला हे सत्य सांगण्यापासून मला रोखू शकत नाही.मनुस्मती ही विकृती आहे, ती पुन्हा येवू पाहतेय त्यामुळे मताच्या दानातून त्यांची स्वप्ने उध्वस्त करा, येणारा एप्रिल-मे महिना देशाच्या इतिहासात सुवर्णक्षराने लिहिणारा ठरले असे विचार,निर्धार,साहस दाखवून द्या,असे आवाहन डॉ.देवी यांनी केले.
आज या देशाचे संविधान, सर्वोच्च न्यायालय आणि संवैधानिक संस्था अडचणीत आल्या आहेत.त्यामुळे जागे होवून आरएसएस आणि मोदीला या निवडणूकात हरवा, नाही तर लाल किल्ल्यावर मोहन भागवतांचे राज्य येईल, साडेचार वर्षात यांनी लोकशाहीचे वाटोळे केलेत,सगळ्या गोष्टीचे खाजगीकरण करण्यात येतेय,पण इथे फॅसिझम चालणार नाही,असा इशारा देवून माणूस म्हणून जगण्यााचा पाया असलेल्या संविधानाच्या रक्षणासाठी पुढे या असे आवाहन, धनाजी गुरव यांनी केले
समाज,राष्ट्रात,मानवी जीवनात जेव्हा सांस्कृतिक घटना घडतात,तेव्हा विचारवंत ,साहित्यिंकांनी भाष्य करायला हवे, ते काम डॉ.गणेश देवी हे निर्भय,संयमीपणे करत आहेत, त्यांच्या आचरणात गांधींच्या विचारमूल्यांचे अंश दिसतात, राज्यवस्थेवर टिका केल्याशिवाय, राज्यवस्थेची समिक्षा केल्याशिवाय विचार पुढे जात नाहीत,प्रगती होत नाही, ही भूमिका ते डॉ.देवी मांडतात.राग,हिंसा,विकृतीविरोधात खंबीरपणेे बोलणे हा पुरुषार्थ आहे,ते दाखवत आहेत, असे मत अध्यक्षीय समारोपात डॉ.नागोराव कुभार यांनी व्यक्त केले.भारतीय संविधानात सगळी मानवी मूल्ये असून,तिचे संरक्षण करण्यासाठी ही परिषद योग्य वेळी घेण्यात आली.आजच्या दमनच्या वातावरणात र्निर्भय होवून मताधिकार बजावा असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी डॉ.शिवाजी जवळगेकर, ऍड.गोमारे ,प्रा.सुधीर अनवले यांनीही विचार मांडले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजा होळकुंदे यांनी केले.अंनिसचे स्वामी यांनी पोवाडा सादर करुन आभार मानले.या परिषदेला सर्वच स्थरातील सुजाण नागरिक, विचारवंत,कार्यकर्ते, संविधानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top