HOME   महत्वाच्या घडामोडी

कमला मील: हॉटेल चालकांची माहिती देणार्‍याला एक लाखाचे इनाम

अग्नीशामक दलाचा अहवाल प्राप्त, अनेक गंभीर चुका

कमला मील: हॉटेल चालकांची माहिती देणार्‍याला एक लाखाचे इनाम

मुंबई- कमला मीलमधील ‘वन अबव्ह’ रेस्टोपबच्या तीन मालकांची माहिती देणार्‍यास एक लाख रुपये इनाम देण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. दरम्यान आगीसाठी हुक्क्य़ाच्या कोळशांची ठिणगी कारणीभूत ठरल्याचा अहवाल अग्निशमन दलाने मुंबई पालिका आयुक्तांकडे दिला आहे. मोजो आणि वन अबव्हमध्ये उपाहारगृह, हुक्का पार्लर तसेच दारूविक्री केली जायची. मोजोकडून एकही परवाना, प्रमाणपत्र अग्निशमन दलाला दिलेले नव्हते. वन अबव्हकडे उपाहारगृहाचा परवाना होता, मात्र हुक्का पार्लर किंवा दारूविक्रीचा परवाना नव्हता. वन अबव्हच्या गच्चीवरील उपाहारगृहासाठी अग्निशमन दलाने २३ डिसेंबर रोजी आरोग्य खात्याकडे ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. मात्र ते प्रत्यक्ष उपाहारगृहाला दिले नसल्याचे तपासणीत आढळून आले आहे. आगीसंदर्भात अहवाल सांगतो, उपाहारगृहात २०० ते ३०० लोक उपस्थित होते. मोजो उपाहारगृहात हुक्क्य़ामधील ठिणगीमुळे पडद्यांनी पेट घेतला. छतापर्यंत आग गेल्यामुळे ती वन अबव्हमध्येही पसरली. मोजोचा काही भाग आणि वन अबव्हच्या छतासाठी बांबू, प्लायवूड, कॉटन आणि नायलॉनचे पडदे, टार्पोलिन (प्लास्टिक), कारपेटचा वापर केलेला होता. घटनेच्या वेळी मोजो बिस्ट्रो आणि वन अबव्हमधील गच्चीवर कोळशाचे निखारे मोठय़ा प्रमाणात वापरले जात होते. मोजोच्या ज्या भागात आगीची तीव्रता जास्त होती. तेथे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. पडद्यांनी पेट घेऊन आग छतापर्यंत पोहोचली. छतावाटे आग पसरली. छताचे पेटलेले बांबू लोकांवर पडायला लागले. आगीमुळे लोकांनी शौचालयाचा आसरा घेतला. त्यात ११ महिला व ०३ पुरुषांचा गुदमरून मृत्यू झाला. अग्नी शमन दलाने आपला हा अहवाल व्हिडीओ, फोटो, समाजमाध्यमांवरील नागरिकांचे संदेश आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार तयार केलेला आहे. अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत तर नव्हतीच, पण अग्निशमन दलाला न कळवल्याने मदत येण्यासाठी वेळ लागल्याचे अहवालात म्हणले आहे. गच्चीवर कार्बन डायऑक्साइडचे सिलिंडर आढळले. अतिक्रमित बांधकामामुळे जिन्याकडे जाणारा मार्ग बंद होता. दुर्घटनेनंतर मोजो आणि वन अबव्हचेही प्रमाणपत्र रद्दही करण्यात आले आहे. आग शॉर्टसर्किट, सिगारेट किंवा घातपातामुळे लागली नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
मेहता यांची नार्को चाचणी करा- महाराष्ट्र नवनिर्माण
आगीच्या दुर्घटनेनंतर राजकीय नेत्यांनी दबाव आणल्याचे मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांचे म्हणणे खरे नाही. त्यांची नार्को चाचणी करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे. आगीनंतर शहरातील बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यात आली. यावेळी २८ हॉटेल आणि बार मालकांसाठी राजकीय नेत्यांनी फोन केल्याचे मेहता यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सांगितले. फोन करणाऱ्यांची नावे उघड करता येणार नसल्याचेही त्यांनी सभेत सांगितले. तसेच फोन करणारे कोण होते याबाबत विरोधी पक्ष खुलासा करु शकतील असेही मेहता यांचे वक्तव्य होते. मेहता यांनी फ़ोन करणार्‍यांची नावे जाहीर करावीत या सर्वच पक्षांच्या मागणीला पाठिंबा देत मनसेने नार्को चाचणीची मागणी केली आहे.


Comments

Top