कोल्हापूर: गेल्या तीन साडेतीन वर्षापासून देशात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारकडून देशातील शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीय आणि व्यापारी अशा सर्व स्तरातील माणसांच्या अपेक्षांचा भंग झाला आहे. केवळ पोस्टरवर केलेल्या विकासाचा स्पर्श सामान्य माणसाला जाणवत नाही. हा सामान्य माणूस अगामी निवडणुकीत या गोष्टींचा समाचार घेतल्याशिवाय राहाणार नाही असे प्रतिपादन अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत पुढे बोलताना आमदार अमित विलासराव देशमुख पुढे म्हणाले की, अलीकडे जाहीर झालेल्या अर्थसंकल्पानेही सामान्य माणूस निरास झाला आहे. उद्योगपुरक व विकासाभिमुख नसलेल्या भाजप सरकारने निरनिराळ्या प्रकारच्या कराचा दहशतवाद निर्माण केला आहे. कोल्हापूरच्या बाबतीत बोलायचे झाले तर येथील साखर उद्योग अडचणीत आलेला असताना ही या उद्योगाला मदत करण्यासाठी सरकारने कोणताही पुढाकार घेतलेला नाही. तीच परिस्थिती कोल्हापूरच्या विमानतळाची आहे. उडाण योजनेपासून कोल्हापूर अजून वंचीत ठेवले आहे. सर्व स्थरातील जनतेच्या अपेक्षा पुर्ण करण्यात अपयश आलेल्या या सरकारने वेळोवेळी उदासीतनता दाखवली आहे. यामुळेच आता मत परिवर्तनाची नांदी सुरू झाली आहे. यापरिस्थितीत आगामी निवडणुकीत आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने निश्चितपणे आश्वासक चित्र निर्माण करण्यात यशस्वी होऊ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी देशपातळीवर समविचारी पक्षाच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. महाराष्ट्रामध्येही ही प्रक्रिया चालू आहे. यामुळे आगामी काळात देशात आणि राज्यात महाआघाडीच्या रुपाने भाजप सरकारसमोर मोठा पर्याय उभा केला जाईल असे आश्वासक चित्रही माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी उभे केले. यावेळी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पी. एन. पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील, बाळासाहेब सरनाईक, माजी खासदार जयवंत आवळे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पाक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments