HOME   महत्वाच्या घडामोडी

नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील अन्न सुरक्षेचा फायदा- गिरीश बापट

नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील अन्न सुरक्षेचा फायदा- गिरीश बापट

मुंबई: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत आता नवीन ९९ लाख शिधापत्रिकाधारकांना अन्न धान्य घेता येणार आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली. यात ४४ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ५६ लाख ६३ हजार २८२ आणि ५९ हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्या ३६ लाख ७३ हजार ३२ याप्रमाणे एकूण ९३ लाख ३६ हजार ३१४ आणि अंत्योदय अन्न योजनेतील ०१ व ०२ सदस्य असलेल्या शिधापत्रिका अशा सुमारे ९९ लाख शिधापत्रिकांचा नव्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समावेश करण्यात येणार आहे. नवीन पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी आता ३० सप्टेंबर २०१६ ऐवजी ३० एप्रिल २०१८ पर्यंतच्या पात्र शिधापत्रिकांचा विचार करण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबांच्या कमाल वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेनुसार, ३० एप्रिल २०१८ पर्यंत आधार सिडींग होऊन पात्र ठरविण्यात आलेल्या सर्व लाभार्थ्यांचा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समावेश करण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्याने हमीपत्र भरून संबंधित शिधावाटप प्राधिकाऱ्याकडे जमा करणे आवश्यक राहणार आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ ची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात ०१ फेब्रुवारी, २०१४ पासून करण्यात येत आहे. त्याकरीता केंद्र शासनाने राज्य शासनास जनगणना २०११ नुसार ग्रामीण भागासाठी ग्रामीण लोकसंख्येच्या ७६.३२ टक्के (०४.७० कोटी) व शहरी लोकसंख्येच्या ४५.३४ टक्के (०२.३० कोटी) याप्रमाणे राज्यासाठी एकूण ६२.३० टक्के (०७कोटी) एवढा इष्टांक दिला आहे.


Comments

Top