HOME   लातूर न्यूज

सांगली पुरात अडकलेल्या २२७ जणांना वाचवले

लातुरहून गेलेल्या बचाव पथकांचा जिल्हाधिकार्‍यांकडून सत्कार


सांगली पुरात अडकलेल्या २२७ जणांना वाचवले

लातूर: मागील आठवडयात सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्हयात अतिवृष्टी झाल्याने या भागात महापूर आला होता. या ठिकाणी लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व साहित्यासह दोन बोटी व १२ जणांचे पथक सांगलीला रवाना झाले होते. या पथकाने सांगली येथे सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अंतर्गत कामाला सुरुवात केली. दोन दिवसांत पुरात अडकलेल्या २२७ नागरिकांना सुखरुप बाहेर काढले. तसेच पुरात अडकलेल्या नागरिकांना अन्नाची पॉकेट वितरण करण्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली. यामुळे लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अग्निशमन अधिकारी विशाल आल्टे यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्त भागात बचाव कामात उत्कृष्ट कामगिरी बजाविल्याबद्दल बचाव पथकातील सदस्यांना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
सन २०१६ च्या दुष्काळात सांगलीकरांनी लातुरकरांना रेल्वेने पाणी पुरवठा केला होता. आपल्या अडचणीच्या काळात सांगलीकरांनी मैत्रीधर्म निभावून लातूरला वेळेत पाणी उपलब्ध करुन ‍दिले होते. त्याच सांगलीकरांच्या या अडचणीच्या काळात लातूर जिल्हावासियांनी तात्काळ मदतीचा हात पुढे करुन सांगलीकरांना मदत केली. बचाव पथकातील या १२ जिगरबाज सदस्यांचे अभिनंदन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले. महापुराच्या अवघड परिस्थितीमध्ये अत्यंत धैर्याने चांगले काम बचाव पथकाने केले असून या कामाचा व तेथील आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा अनुभव आला असून इतर ठिकाणी गरज पडल्यास अशावेळी आपण सदैव तत्पर रहावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बचाव पथकाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी आल्टे व महादेव पानपट्टे यांनी पूरग्रस्त भागात बचावात बजावलेल्या कामगिरीचे अनुभव कथन केले. लातूरचे बचाव पथक कोणत्याही आपत्तीमध्ये काम करण्यास सदैव तत्पर असेल अशी ग्वाही दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, पोलिस उप अधिक्षक मधुकर जवळकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांच्यासह इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.


Comments

Top