HOME   टॉप स्टोरी

बारावी: लातूर सातव्या क्रमांकावर, कोकण अव्वल

लातूर विभागात लातूर पहिला, नांदेड दुसरा तर उस्मानाबाद तिसर्‍या क्रमांकावर


लातूर: आज घोषित झालेला बारावीचा राज्याचा निकाल मागच्या वर्षाच्या तुलनेत २.५३ टक्याने कमी आहे. राज्यातील नऊ विभागात कोकणने पहिला क्रमांक पटकावला. या विभागाने आपला निकाल ९३.२३ टक्के एवढा नोंदवला. राज्यात लातूर विभाग सातव्या क्रमांकावर राहिला. लातूर विभागाचा निकाल ८६.०८ टक्के लागला. यंदाही विभागात मुलींनीच बाजी मारली. मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण ९१.२४ तर मुलांचं प्रमाण ८२.१९ टक्के एवढं आहे.
लातूर विभागात ८६ हजार १४७ जण परिक्षेस पात्र होते. त्यापैकी ८५ हजार ९४९ जणांनी परिक्षा दिली. ७३ हजार ९८८ जण उत्तीर्ण झाले. विभागातील नांदेड जिल्ह्याचा निकाल ८६.२०, उस्मानाबाद ८२.७२ तर लातूर जिल्ह्याचा निकाल ८७.५० टक्के नोंदला गेला. नांदेड जिल्ह्यातील मुलींचं उत्तीर्णाचं प्रमाण ९०.८६ टक्के, मुले ८२.६३, लातूर जिल्ह्यात ९२.०७ टक्के मुली तर ८४.१९ टक्के मुले उत्तीर्ण झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील ९०.३८ टक्के मुली तर ८६.६४ मुले उत्तीर्ण झाली अशी माहिती लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे प्रभारी सचिव चित्तप्रकाश देशमुख यांनी दिली.


Comments

Top