HOME   टॉप स्टोरी

अखेर लातूरकरांनी उजनीचे पाणी मिळविलेच

पाणी पुरवठा मंत्र्यांनी केली घोषणा, लवकरच निविदा प्रक्रिया, जलाग्रहीचा दावा


लातूर: ‘जलाग्रही लातूर’ या सर्वसामान्य लातूरकरांच्या चळवळीस यश मिळत अखेर लातूरला उजनीचे पाणी मंजूर करण्यात आले. लातूरच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी या घटनेची नोंद केली जाईल. औरंगाबाद येथे आयोजित मराठवाडा टंचाई आढावा बैठकीत याबाबतची घोषणा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली. येत्या दोन महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येतील असेही त्यांनी आश्वस्त केलं. औरंगाबाद येथे मराठवाडा टंचाई आढावा बैठकीच्या निमित्ताने आलेल्या पाणीपुरवठा मंत्री यांची जलाग्रही लातूरच्या शिष्टमंडळाने भेट घेवून उजनीचे पाणी लातूरला मिळावे याचे निवेदन दिले व सविस्तर चर्चा केली. तसेच याची उपयुक्तता व आवश्यकता अधोरखित केली. यावेळी लातूर चे खासदार सुधाकर शृंगारेही उपस्थित होते. यापूर्वी जलाग्रही लातूरच्या वतीने देशाचे पंतप्रधान, जलशक्तीं मंत्री, मुख्यमंत्री, पाणीपुरवठा मंत्री यांच्याकडे वेळोवेळी त्यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता.
जलाग्रही लातूर या अराजकीय उपक्रमांद्वारे सर्व सामान्य लातूरकरांनी लक्षवेधी लढा उभारला होता. मिस्ड कॉल अभियानांतर्गत ४३००० पेक्षा अधिक लातूरकर या उपक्रमात सहभागी होत उजानीचे पाणी मिळावे यासाठी आग्रही झालेले होते. लातूरला उजनी पाणी बंद पाईपलाईनद्वारे मांजरा धनेगाव धरणास जोडण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात या कामासाठी ३६५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून पुढील २ महिन्यात निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येवून येत्या ०६ महिन्याच्या आत प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे जाहीर करण्यात आले. पुढील १५ दिवसात लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या हरकती व सूचना मागविण्यात येवून अंतिम आराखडा मंजूर करण्यात येणार आहे. उजनीचे पाणी लातूरला देताना सर्व प्रकारच्या कायदेशीर प्रक्रिया आणि तरतूद पूर्ण करून हा निर्णय घेण्यात आल्याचेही पाणी पुरवठा मंत्री यांनी स्पष्ट केले. यापूर्वी जलाग्रही लातूर च्या वतीने राज्यपाल यांची भेट घेवून ही पाठपुरावा करण्यात आला होता.
सर्वसामान्य लातूरकरांच्या एकत्रित प्रयत्नांना यश येवून लातूर ची अनेक वर्षापासूनची प्रलंबित मागणी मान्य करवून घेतल्याबद्दल जलाग्रही लातूरच्या वतीने लातूरकरांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच राज्य शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले असे ‘जलाग्रही’ने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


Comments

Top