लातूर: रोजगार-कामाच्या निमित्ताने लातूर सोडून परगावी किंवा परदेशात गेलेल्यांनी लातुरात परत यावं. गाव, जिल्हा, राज्य, देश नव्यानं घडविण्याच्या मोहिमेत सहभागी व्हावं, आपलं योगदान द्यावं, नवा देश घडविण्याच्या मोहिमेत सहभागी व्हावं अशी पंतप्रधानांची इच्छा आहे. त्यासाठीच ‘स्वदेश’ नावाचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. माहिती सहाय्यक संचालक मीरा ढास यांनी त्यांची या विषयावर आज मुलाखत घेतली.
नवीन भारत घडवण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात आलं आहे. जे लोक लातुरातून रोजगारासाठी बाहेरगावी किंवा बाहेर देशी गेले त्यांनी परतावं असं आवाहन जिल्हाधिकार्यांनी केलं. या परतणार्या कुशल व्यक्तींच्या हातून नवं गाव घडेल, तालुका, जिल्हा आणि राज्य घडेल पर्यायाने नवा विकसित देश आकार घेईल अशी पंतप्रधानांची संकल्पना आहे. त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे जिल्हाधिकारी म्हणाले. यासाठी सोशल मिडियाचा वापरही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. स्वतंत्र वेबसाईटही सुरु करण्यात आली आहे, ट्वीटर आणि फेसबुकचाही आधार घेतला जात आहे, नवा भारत घडविण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्यास हातभार लावू असेही जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्हाधिकार्यांच्या या उपक्रमाला आजवर २५० जणांनी प्रतिसाद दिल्याची माहिती मिळत आहे.
Comments