HOME   लातूर न्यूज

वीज बिलामुळे शेतकर्‍याने आत्महत्येचा केला प्रयत्न, प्रकृती चिंताजनक

महावितरणच्या कार्यालयात घडली घटना, आशिर्वाद रुग्णालयात उपचार सुरु


वीज बिलामुळे शेतकर्‍याने आत्महत्येचा केला प्रयत्न, प्रकृती चिंताजनक

लातूर: सततची नापिकी आणि कर्जाचे ओझे यामुळे शेतकरी आत्महत्या करतात आता महावितरणच्या बिलामुळे आत्महत्या करण्याची वेळ एका शेतकर्‍यावर आली आहे. या शेतकर्‍यानं रोगर नावाचं विषारी किटकनाशक प्राशन केलं असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. आत्महत्या करण्याचा प्रयत्न महावितरणच्याच कार्यालयात घडल्यानं खळबळ उडाली आहे. औसा तालुक्यातील एकंबी तांड्यावर शहाजी राठोड यांची अडीच एकर जमीन आहे. त्यांना शेतीपंपाचं वीज बील ५९ हजार रुपये इतकं आलं आहे. अलीकडे थकित बिलांमुळे वीजपंपांचे कनेक्शन तोडले जात आहेत. त्यांचेही कनेक्शन तोडण्यात आले होते. याचा धसका त्यांनी घेतला होता. हे वीज बील कमी करावे किंवा त्याचे हप्ते पाडून द्यावेत आणि पुन्हा वीज जोडणी द्यावी यासाठी शहाजी यांनी औसा आणि उजनी येथील महावितरणच्या कार्यालयात अनेकदा चकरा मारल्या पण त्याला यश आले नव्हते. आज सकाळी उजनी येथील महावितरणच्या कार्यालयात आणखी एकदा विनंती केली. पण कुणीच ऐकलं नाही. अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या समोर त्यांनी सोबत आणलेले रोगर नावाचे किटकनाशक प्राशन केले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. लातुरच्या आशिर्वाद रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक आहे.


Comments

Top